मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावल्याने मुंबईकर चांगलेच सुखावले आहेत. दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी भरतीची वेळ असल्यामुळे समुद्राला चांगलंच उधाण आलं आहे. समुद्राच्या लाटा थेट रस्त्याला येऊन भीडत अाहेत. सतर्कतेचा इशारा म्हणून समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं अाहे. असं असूनही मुंबईकरांची पावलं या लाटांचा आनंद घेण्यासाठी मुंबईच्या चौपट्यांकडे वळत आहेत.
पावसाळा सुरू होताच मुंबईकरांची पावलं मुंबई नजीकच्या धबधब्यांकडे वळू लागतात. परंतु यंदा ठाणे, रायगड परिसरातील धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याने मुंबईकरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यामुळे विकेंड असल्याने मुंबईकर चौपाट्यांवर जाऊन लाटांचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करत आहेत. गेट वे ऑफ इंडिया, वरळी सी फेस, दादर चौपाटी आणि वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड इथं मुंबईकरांनी सकाळपासून गर्दी करण्यास सुरूवात केली अाहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास भरतीचा काळ असल्याने १ वाजून २ मिनिटांनी ४.९६ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. रविवारी देखील ४.३९ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी समुद्र चौपाट्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. हवामान खात्याने ठाणे आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे.
हेही वाचा-
मुंबईत पावसाचा आनंद घ्यायचाय? मग या १० ठिकाणी या!
मरिन ड्राइव्हवर झाडांना घातले रेनकोट