Advertisement

सुसंवाद वाढवून लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, गृहमंत्र्यांची पोलीस दलाला सूचना

समाजातील विविध घटकांशी सुसंवाद वाढवून लोकांमध्ये सुरक्षेच्या उपायांबाबत विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत, अशा प्रकारच्या सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्यांना केल्या

सुसंवाद वाढवून लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, गृहमंत्र्यांची पोलीस दलाला सूचना
SHARES

समाजातील विविध घटकांशी सुसंवाद वाढवून लोकांमध्ये सुरक्षेच्या उपायांबाबत विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत, नियमांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, अशा प्रकारच्या सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्यांना केल्या.

कोरोना विषाणूचा (coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांची  प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यातील सद्य:स्थितीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. राज्यातील कायदा-सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या सूचना त्यांनी  यावेळी संबंधितांना  दिल्या.

अडचणींची माहिती

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस विभाग सातत्याने कार्यरत आहे. या काळातील बंदोबस्ताचं नियोजन, पोलीस कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसंच पोलिसांच्या अडचणींची माहिती देखील दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी घेतली. या बैठकीला गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा- मराठा समाजाला भडकवणारी वक्तव्य करू नका- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

विसंगत कृती नको

राज्यात कडक निर्बंध लावले आहेत त्याची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणं हा आहे हे लक्षात ठेवावं आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसंच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांना जनमानसात फिरावं लागतं. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याबाबतही दक्षता घ्यावी. संसर्ग झाल्यास तात्काळ उपचारासाठी रुग्णालय व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.  पोलीस दलातील प्रत्येकाचं तसंच त्यांच्या कुटुंबियांचं लसीकरण करुन घ्यावं. त्यासाठी आवश्यक त्या सोयी सवलती उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देशही दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी यावेळी दिले.

समन्वय साधा

आगामी काळातील  सण, उत्सव शातंतेत आणि सुव्यवस्थेत पार पडावेत यासाठी विविध घटकांशी सुसंवाद वाढवावा, लोकांमध्ये सुरक्षेच्या उपायांबाबत विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत, नियमांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा असेही ते  म्हणाले. पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात समन्वयाचे नाते निर्माण करण्याच्या सूचना करत जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देशही त्यांनी दिले. तसंच या काळात समाजमाध्यमांवर पोलिसांनी करडी नजर ठेवावी. आक्षेपार्ह पोस्ट आणि अफवा पसरणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात यावी असं त्यांनी सांगितलं.

पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजना व अंमलबजावणीची माहिती दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा