Advertisement

शिवभोजन थाळी विकायचीय? मग या अटी वाचा..

तुम्हाला देखील या उपक्रमात वाटेकरी व्हायचं असेल तर सरकारनं काही तरतूद केली आहे. सरकारनं दिलेल्या अटींवर तुम्ही खरे उतरत असाल तर तुम्ही देखील या योजनेला हातभार लावू शकता.

शिवभोजन थाळी विकायचीय? मग या अटी वाचा..
SHARES

महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना रविवारपासून मुंबईत सुरू करण्यात आली आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना १० रुपयात जेवण उपलब्ध करून द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा अध्यादेशही आता काढण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे.

'या' आहेत अटी

तुम्हाला देखील या उपक्रमात वाटेकरी व्हायचं असेल तर सरकारनं काही तरतूद केली आहे. त्यासाठी सरकारनं नियमावली काढली आहे. सरकारनं दिलेल्या अटींवर तुम्ही खरे उतरत असाल तर तुम्ही देखील या योजनेला हातभार लावू शकता.

  •  शिव भोजनालय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची पर्याप्त जागा असणं गरजेचं
  • खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येईल
  • महापालिका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल
  • गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त असलेल्या ठिकाणी म्हणजे जिल्हा रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये यासारख्या ठिकाणी थाळीची विक्री केली जाईल

शिवभोजन योजनेसाठी ६.४८ कोटीचे अनुदान


  • योजनेवर संनियंत्रण, पर्यवेक्षण ठेवण्यासाठी राज्य स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती असेल. ही समिती सर्व पर्यायांचा विचार करून योजनेचा पुढील टप्पा ठरवण्याची कार्यवाही करेल.
  • सेंट्रल किचन, नामवंत स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक न्यास आणि सीएसआर आणि व्हीएसटीएफ इत्यादींच्या सहभागाबाबत निर्णय घेईल आणि शासनाच्या सहभागाबद्दल रुपरेषा ठरवेल
  • योजना शाश्वत आणि टिकणारी होण्यासाठी समिती क्रॉस सबसिडी आणि सार्वजनिक- खाजगी भागीदारीचे तत्व वापरण्यावर भर देईल


मुंबईत कुठे घ्याल लाभ?

योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रायेागिक तत्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये वांद्रे इथल्या जिल्हा अधिकारी कार्यालय आणि नायर रुग्णालयात ही सेवा सध्या सुरू करण्यात आली आहे.  या संपूर्ण योजनेसाठी शासनानं चालू वित्तीय वर्षात उर्वरित तिमाहीसाठी ६.४८ कोटी रुपयांची रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली आहे.

पहिल्या दिवशीचा आढावा

दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार पहिल्या दिवशी नाशिकमध्ये १,००० तर ठाणे इथं १,३५० थाळ्यांची विक्री झाली आहे. जळगाव, अहमदनगर, सोलापूर विभागात प्रत्येकी ७०० थाळ्यांची विक्री झाली आहे. या थाळीचा लाभ घेण्यासाठी फेस रेकग्निशन फोटो आणि आधार कार्डाची (aadhar card) सक्ती करण्यात येईल, असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. पण रविवारी शिव भोजन थाळी सुरू झाल्यावर अनेक ठिकाणी आधार कार्ड सक्तीचं नसल्याचं पाहायला मिळालं



हेही वाचा

शिवभोजन थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ११,२७४ थाळींची विक्री

हा बघा, २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब, मनसेचा जितेंद्र आव्हाडांना टोला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा