महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना रविवारपासून मुंबईत सुरू करण्यात आली आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना १० रुपयात जेवण उपलब्ध करून द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा अध्यादेशही आता काढण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे.
तुम्हाला देखील या उपक्रमात वाटेकरी व्हायचं असेल तर सरकारनं काही तरतूद केली आहे. त्यासाठी सरकारनं नियमावली काढली आहे. सरकारनं दिलेल्या अटींवर तुम्ही खरे उतरत असाल तर तुम्ही देखील या योजनेला हातभार लावू शकता.
योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रायेागिक तत्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये वांद्रे इथल्या जिल्हा अधिकारी कार्यालय आणि नायर रुग्णालयात ही सेवा सध्या सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण योजनेसाठी शासनानं चालू वित्तीय वर्षात उर्वरित तिमाहीसाठी ६.४८ कोटी रुपयांची रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार पहिल्या दिवशी नाशिकमध्ये १,००० तर ठाणे इथं १,३५० थाळ्यांची विक्री झाली आहे. जळगाव, अहमदनगर, सोलापूर विभागात प्रत्येकी ७०० थाळ्यांची विक्री झाली आहे. या थाळीचा लाभ घेण्यासाठी फेस रेकग्निशन फोटो आणि आधार कार्डाची (aadhar card) सक्ती करण्यात येईल, असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. पण रविवारी शिव भोजन थाळी सुरू झाल्यावर अनेक ठिकाणी आधार कार्ड सक्तीचं नसल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा