गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या मुंबईकरांना आता परतीचे वेध लागले असून, रेल्वे किंवा खासगी बस यांच्यापेक्षा प्रवासी एसटीलाच अधिक पसंती देत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर कोकणात दाखल झालेल चाकरमानी मिळेल त्या गाडीनं परतीच्या प्रवासाला लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासीयांचा ओढा एसटीकडे जास्त असल्याचं दिसून येत आहे.
पाच आणि सात दिवसांचा गणेशोत्सव आटपून चाकरमानी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रवासी उपलब्धतेनुसार हंगामी आणि जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. याखेरीज मुंबईकडे येणाऱ्या नियमित एसटी बसही फुल्ल झाल्या आहेत. मुंबईला जाणाऱ्या बसेसमध्ये सावंतवाडी-बोरिवली, वेंगुर्ले-बोरिवली, कुडाळ-बोरिवली, मालवण-बोरिवली, कणकवली-बोरिवली, फोंडा-बोरिवली, कणकवली-मुंबई, देवगड-बोरिवली, देवगड-नाटे-बोरिवली आदी गाड्यांचा समावेश आहे.
१७ सप्टेंबरपासून चाकरमान्यांनी मुंबईच्या दिशेनं परतीचा प्रवास सुरू केला असून आतापर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या विभागातून तब्बल २ हजार २०० एसटी बसची आरक्षण नोंदणी झाली आहे. त्याशिवाय मंगळवारी एका दिवसात तब्बल १ हजार ०७७ एसटी मुंबईकडे रवाना झाल्या असून त्यात ५० हजार पेक्षा अधिक गणेश भक्त सुखरूपपणे मुंबईत दाखल झाले आहेत.
कोकणातून दररोज सुटणाऱ्या ३०० ते ३५० नियमित बस आरक्षण २३ तारखेपर्यंत झाले आहेत. हा प्रतिसाद पाहता कोकणवासीयांनी पुन्हा एकदा एसटीला अधिक पसंती दिल्याचं समोर आलं आहे. त्याशिवाय एसटीची ही सर्व वाहतूक सुनियोजितरित्या आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आभार मानले आहेत. त्यासोबतच या संपूर्ण वाहतुकीमध्ये सुनियोजितता आणण्यासाठी परिवहन विभाग, महामार्ग आणि वाहतूक पोलिसांंचेही त्यांनी आभार मानले आहेत.