कोरोना संसर्गाचा (coronavirus) वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी पूर्ण लॉकडाऊनचे आदेश जारी केले होते. त्यानुसार या लाॅकडाऊनला मंगळवार ३० मार्चपासून सुरूवात झाली आहे. पुढील १० दिवस हे लाॅकडाऊन कायम असणार आहे.
लाॅकडाऊनच्या कालावधीत किराणा मालाची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२, दूध विक्री-वितरण व भाजीपाला दुकाने सकाळी ६ ते ११, मटण, चिकण विक्री सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सुपर मार्केट्समध्ये फक्त किराणा व भाजीपाला विक्रीस परवानगी आहे. घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तिस गणवेश व ओळखपत्र आवश्यक आहे. लॉकडाऊनमधून उद्योग क्षेत्राला वगळण्यात आलं आहे.
बीड आणि नागपूरमध्ये आधीच घोषित करण्यात आलेला लाॅकडाऊन देखील पुढं वाढण्याची शक्यता आहे. बीडमध्ये २५ मार्चपासून पूर्ण लाॅकडाऊन लागू करण्यात आला होता. ४ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. तर नागपूरमधील लाॅकडाऊनची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे.
महाराष्ट्रात (maharashtra) कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारला नाईलाजाने राज्यभरात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास पुन्हा एकदा पूर्ण लाॅकडाऊन लावण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
हेही वाचा- महाराष्ट्र लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर? कधीही होऊ शकतो निर्णय…
शेवटी लोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचं पालन करावं अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असं समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी नोंदवण्यात आली. एक दिवस आधीच ४० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यावर सोमवार ३१,६४३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर मागील २४ तासांत १०२ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून २७,४५,५१८ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत २३,५३,३०७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ३,३६,५८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.