काही दिवसांपूर्वी तुळजापूर येथील ज्ञानेश्वर साळवे याने मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढून आत्महत्या करण्याचा इशारादिला होता. या घटनेनंतर धडा घेत अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील खिडक्यांवरील मोकळ्या जागेत आता लोखंडी ग्रील बसवले जाणार आहे.
मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गृह विभागाने हा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला आहे. काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर साळवे या तरुण शेतकऱ्यांने शेतीमालाचा भाव पडल्याने मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन करत मंंत्री आणि अधिकाऱ्यांना घाम फोडला होता. त्या पाश्वभूमीवर खिडक्यांवर ग्रील बसवण्याची सूचना करण्यात आली आहे. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेत मंत्रालयातील खिडक्यांच्या वरील जागेत लोखंडी ग्रील आणि चौकटी असलेल्या ठिकाणी तातडीने दरवाजे बसवण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे.