Advertisement

मुंबईत अपघाती मृत्यूंमध्ये 24% घट

महाराष्ट्रमध्ये रस्ते सुरक्षेत सुधारणा

मुंबईत अपघाती मृत्यूंमध्ये 24% घट
SHARES

महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईमध्ये, रस्ते सुरक्षेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे अलीकडील परिवहन विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

या आकडेवारीनुसार, अपघात आणि मृत्यूदरात वर्षानुवर्षे घट होत असून, कडक अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.

मुंबईत अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २४ टक्क्यांनी घट झाली आहे. हा सकारात्मक कल संपूर्ण महाराष्ट्रभरही दिसून येत आहे.

जानेवारी-फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण 6,113 अपघातांची नोंद झाली, जी 2025 मधील 6,209 च्या तुलनेत कमी आहे. विशेष म्हणजे, मृत्यूजन्य अपघातांची संख्या 2,556 वरून 2,362 इतकी घटली, तर मृत्यूंची संख्या 2,753 वरून 2,539 इतकी कमी झाली. म्हणजेच 194 कमी मृत्यूजन्य अपघात आणि 214 कमी मृत्यू, एकूण सुमारे 8 टक्के घट नोंदवली गेली.

अधिकाऱ्यांच्या मते, या सुधारण्यामागे अधिक आक्रमक आणि नियोजनबद्ध रस्ते सुरक्षा धोरण आहे. परिवहन विभागाने रडार गन आणि इंटरसेप्टर वाहनांनी सज्ज विशेष पथकांद्वारे अंमलबजावणी वाढवली आहे.

तसेच अपघातप्रवण “ब्लॅक स्पॉट्स” ओळखून त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत आणि जिल्हानिहाय कृती आराखडे राबवले जात आहेत.

तथापि, नियमभंग अजूनही मोठी समस्या आहे. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वार आणि मागील प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. याशिवाय, ओव्हरस्पीडिंग, सीटबेल्ट न वापरणे, प्रदूषण प्रमाणपत्र नसणे आणि विमा नसलेली वाहने अशा उल्लंघनांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे.

तंत्रज्ञानाचा वापर या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रडार-आधारित निरीक्षण आणि स्वयंचलित चाचणी प्रणालींचा विस्तार केला जात आहे. यंदाच्या वर्षात अनेक स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे आणि ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्याचे नियोजन आहे.

तसेच, 25,000 किमी रस्त्यांवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम लागू केली जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गवर ही प्रणाली आधीच कार्यरत असून, गेल्या वर्षात अपघातांमध्ये 19 टक्क्यांनी घट झाली आहे.

इतर उपक्रमांमध्ये आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक जलद करणे, शालेय वाहतुकीसाठी नवीन सुरक्षा नियम, तसेच दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी जनजागृती मोहीम यांचा समावेश आहे.

शहरनिहाय पाहता, नवी मुंबईमध्ये मृत्यूदरात 29 टक्क्यांची घट झाली आहे, तर नाशिकमध्ये सर्वाधिक 53 टक्के घट नोंदवली आहे. तसेच नागपूर (34%), सिंधुदुर्ग (47%) आणि वाशीम (45%) येथेही लक्षणीय घट दिसून आली आहे.

2030 पर्यंत रस्ते अपघातांतील मृत्यू अर्ध्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्र सरकार बहुआयामी रणनीती राबवत आहे. मात्र, ही सुधारणा टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक राहणार आहे.



हेही वाचा

दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या तीव्र

मध्य मुंबईत वाहतूक बदल

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा