मुंबईसह ठाण्यात मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानं मुंबईसह कोकणात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत मुंबईकरांना थंडीची चाहुल लागली आहे. मात्र, सोबतच असणारा उकाडा यामुळं मुंबईकरांना बदलत्या वातावरणाचा त्रास सहन करावा लागतो.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून मुंबई, ठाण्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
दिवाळीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र कमी दाबाचे क्षेत्र किनाऱ्यापासून दूर गेल्यानं कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव कमी जाणवला होता. आता पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, ऑक्टोबर हिट ही नोव्हेंबर महिन्यात जाणवत आहे. तसंच, मधीच थंड तर, मधीच गरम या अशा वातावरणामुळं मुंबईकरांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो आहे.