गोरेगावमधील आरे रोड येथील मिठी नदीवरून जाणारा पूल धोकादायक आहे. हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिटरनं महापालिकेला दिला आहे. या पुलावरून ५ टनापेक्षा अधिक वजनाच्या वाहनाची वाहतूक पुलासाठी धोकादायक ठरू शकतं, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं या मार्गावरून ५ टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना वाहतुकीला पालिकेकडून बंदी घालण्यात आली आहे. हा पूल कमकुवत झाल्यामुळं दोन्ही बाजूला हाईट बॅरिअर लावण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचं नव्यानं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता. त्यानुसार पालिकेनं सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरूवात केली.
या कामासाठी पालिकेच्या पूल विभागानं नेमलेल्या मे. कॉन्स्ट्रुयुमा कन्सल्टन्सी प्रा.लि. यांनी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार मिठी नदी, आरे रोड येथील पूल कमकुवत झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ऑडिटनुसार या पुलाच्या सुरक्षेसाठी ५.० टनपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
पूल धोकादायक असल्यानं पुलाच्या दोन्ही बाजूस हाईट बॅरिअर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळं पालिकेनं तात्काळ या पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई केली आहे.
हेही वाचा -