मुंबई शहरातील (greater mumbai) विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (mmrda) 4.07 लाख कोटी रुपयांचे वित्तसाह्य (funding) मिळणार आहे. याद्वारे सर्व मेट्रो मार्गिका, भविष्यातील जोडरस्ते, द्रुतगती मार्ग, उड्डाणपूल यांची कामे मार्गी लागणार आहेत.
मुंबई (mumbai) शहरातील 6 हजार चौरस किमीहून अधिक क्षेत्रफळावरील विकासकामांची जबाबदारी ‘एमएमआरडीए’वर आहे. त्यामध्ये पाच प्रशासकीय जिल्हे, आठ महापालिका क्षेत्र व पाच नगर परिषदांचा समावेश आहे.
या परिसरात ‘एमएमआरडीए’कडून आठ उन्नत मेट्रो मार्गिका व चार मोठ्या जोडरस्त्यांसह (connector) एकूण सहा महत्त्वाच्या प्रकल्प उभारणीची कामे सुरू आहेत. सध्या बांधकामाधीन असलेल्या विकासकामांचा प्रकल्पखर्च 1.18 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे.
याखेरीज अन्य चार मेट्रो मार्गिका व एका महत्त्वाच्या सागरी सेतूची उभारणी प्रस्तावित आहे. या सर्वांच्या प्रकल्पखर्चासाठी प्राधिकरणाने वित्तसाह्याचे नियोजन केले असून, ते पूर्णत्वास आले आहे.
‘प्राधिकरणाने भविष्यातील सर्वच कामांसाठी वित्तसाह्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेले प्रकल्प व भविष्यातील प्रकल्प मिळून आवश्यक असलेले सर्व वित्तसाह्य उपलब्ध होणार असल्याने प्रकल्पांमध्ये अडथळा येणार नाही’, असा विश्वास ‘एमएमआरडीए’तील उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केला आहे.
एकूण 4.07 लाख कोटी रुपयांच्या वित्तसाह्यापैकी 1.32 लाख कोटी रुपयांचे अर्थसाह्य ‘एमएमआरडीए’ला 2024-25 या आर्थिक वर्षात प्राप्त झाले. त्यामध्ये केंद्र सरकारी आरईसी, पीएफसी, हुडको या कंपन्यांचा समावेश आहे. तर चालू आर्थिक वर्षात आणखी 1 लाख कोटी रुपयांचे वित्तसाह्य मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उत्तन-विरार सागरी सेतू हा 'एमएमआरडीए'चा आगामी सर्वांत मोठा प्रकल्प असेल. 87 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळेच प्राधिकरणाची वित्तीय गरज वाढून ती 4.07 लाख कोटी रुपयांच्या घरात गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकल्पासाठी 'जायका' कडून वित्तसाह्य मिळवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
हेही वाचा