भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी मुंबईसाठी यलो अलर्ट जाहीर केला. त्यानुसार मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास इतका असू शकतो.
तसेच पुढील चार तासांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईत आज कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रविवारीच हवामान विभागाने राज्यात मान्सून आगमनाची अधिकृत घोषणा केली होती. यंदा मान्सून महाराष्ट्रात 5 जूनच्या नेहमीच्या तारखेच्या तब्बल दहा दिवस आधी दाखल झाला आहे. 1990 नंतर यंदा प्रथमच इतक्या लवकर मान्सून राज्यात पोहोचला आहे.
हवामान खात्याच्या नोंदीनुसार, यंदाच्या मे महिन्यात महाराष्ट्रात गेल्या ३५ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 1 ते 23 मे या कालावधीत राज्यात सरासरी 79.6 मिमी पाऊस झाला आहे, जो नेहमीच्या 7.9 मिमीच्या सरासरीपेक्षा तब्बल 844 टक्के जास्त आहे. 1990 मध्ये याच कालावधीत राज्यात 99.8 मिमी पाऊस झाला होता. त्याआधी 1918मध्ये 113.6 मिमी पावसाची नोंद झाली होती, जी आजवरची सर्वोच्च नोंद आहे.
यंदाच्या पावसाळ्याची सुरुवात जोरदार झाली असून, हवामान विभागाने आगामी काळातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कृषी विभागानेही शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला देत पेरण्या अद्याप न करण्याचा सल्ला दिला आहे. जोरदार पावसामुळे नद्या, नाले भरून वाहण्याची शक्यता आहे. परिणामी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असून, पावसात गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः समुद्रकिनारी, नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा