वर्षानुवर्षे मुंबईकरांना वेळेवर जेवणाचे डबे पोहोचविणारे डबेवाले आठवडाभरासाठी सुट्टीवर जाणार आहेत. येत्या 10 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत डबेवाल्यांच्या गावच्या कुलदैवताची जत्रा असल्यामुळे डबेवाले सुट्टीवर जाणार असल्याचे डबेवाला संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.
मुंबईचे बहुतांश डबेवाले हे पुणे, अहमदनगर, अकोला आणि संगमनेर विभागातील असून, त्यांच्या गावांमध्ये ग्रामदैवत आणि कुलदैवतेची जत्रा आहे. त्यामुळे सर्व डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत. मुंबईतील अनेक सरकारी आणि खासगी नोकरी करणाऱ्यांना सकाळी कामावर जाताना घरातून जाताना जेवणाचा डबा घेऊन जाता येत नाही. पण, त्यांना त्यांच्या कार्यालयात घरातील रुचकर आणि चविष्ट जेवण वेळेवर पोहोचविण्याचे काम मुंबईचे डबेवाले करतात. काही ग्राहक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सहकुटुंब गावी गेले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात डबेवाल्यांचे डबे बंद आहेत. या सुट्टीमुळे इतर ग्राहकांची गैरसोय होणार असल्यामुळे डबेवाल्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच आमचा रजेचा पगार कोणत्याही ग्राहकांनी कापू नये अशी विनंती देखील डबेवाल्यांच्या संघटनेने केली आहे.