कुलाबा येथील मलजल शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी उपलब्ध करून देण्याचं महापालिकेने जाहीर केलं असलं तरी आता हे प्रक्रीया केलेले पाणी आग विझवण्यासाठी 'हायड्रंट'च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कुलाबा मलजल शुद्धीकरणातील पाणी आता स्वतंत्र जलवाहिनी टाकून 'हायड्रंटला जोडून त्याचा वापर अग्निशमन दलाच्या उपलब्ध करून दिला जाईल, असं अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी महापालिका स्थायी समितीच्या सभेत सांगितलं.
मुंबईतील रासायनिक द्रव्यामुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटना नियंत्रणात आणण्यासाठी 'हॅचमॅट' वाहनांची खरेदी केली जात असल्यामुळे स्थायी समिती सदस्यांनी आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध नसते. परंतु आपण वाहने खरेदी करत असल्याची बाब मांडली. या मुद्दयावर अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी हे निवेदन करत मलजल शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेलं पाणी आग विझवण्यासाठी वापरलं जाईल, असं सांगितलं.
सध्या कुलाबा येथे ३७ एमएलडी मलजलावर प्रक्रीया करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्प येत्या फेब्रुवारी २०१९ला पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसंच चिंचपोकळी मलजल उदंचन केंद्राचे कामही हाती घेण्यात आलं असून यातून १७ एमएलडी पाण्यावर प्रक्रीया करून ते शुद्ध केलं जाणार आहे. याशिवाय वल्लभनगर येथे मलजलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम मागील वर्षी सुरु झालं आहे. यातून २३२ एमएलडी एवढं प्रक्रीया केलेलं पाणी उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे हे प्रक्रीया केलेले पाणी स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पुरवलं जाणार आहे. या जलवाहिनी हायड्रंडला जोडल्या जाणार असून आगीसारखी दुघर्टना घडल्यास या 'हायड्रंटद्वारे पाणी उचलून आग विझवण्याचे मदतकार्य राबवलं जाईल, अशी माहिती मुखर्जी यांनी दिली. त्यामुळे शहर भागातील 'हायड्रंटच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
हेही वाचा -
'झोपडपट्टयांच्या नळजोडणीत दलाल नको, अधिकाऱ्यांनीच करावे काम'