मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मागच्या २४ तासांत २०० हून अधिक कोरोनाबाधित आढळून आल्याने आरोग्य विभागापुढं नवं आव्हान उभं राहिलं आहे. याकडे पाहता पुढच्या ८ ते १० दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात न आल्यास मुंबईत अंशतः लॉकडाऊन लागू शकतं, असा इशारा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख (aslam shaikh) यांनी दिला आहे.
मुंबईत सद्यस्थितीत दररोज १ हजारहून नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यानुसार शहरात शनिवारी १,१८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर रविवारी १,३६० नवीन रुग्णांची भर पडली आहे. अवघ्या २४ तासांतच मुंबईत सरासरीपेक्षा दोनहून जास्त रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे एका बाजूला कोरोना विषाणू (coronavirus) प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम हाताळणाऱ्या आरोग्य विभागाला वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा भार देखील सांभाळावा लागत आहे. अशा दुहेरी जबाबदारीमुळे आरोग्य विभागापुढील आव्हान आणखीनच कठीण होत चाललं आहे.
हेही वाचा- अधिवेशनावर कोरोनाचं सावट: ३६ जणांना लागण
महाराष्ट्रातील (maharashtra) इतर जिल्ह्यातील स्थिती देखील फारशी समाधानकारक नाही. गेल्या आठवड्यात म्हणजेच सोमवार ते शनिवार या ६ दिवसांमध्ये राज्यात ५३,५१६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर गेल्या ३ दिवसांची आकडेवारी पाहिल्यास दररोज १० हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद आहे.
सध्या राज्यात कोरोनाचे ९२ हजार ८९७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १९ हजार ६१५ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात ११, ४८०, ठाणे जिल्ह्यात १०, ४४, तर मुंबई महापालिका (bmc) हद्दीत ८, ९८४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार ७ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे ज्या जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख खाली येणार नाही, अशा जिल्ह्यात अंशत: लाॅकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू करण्यात येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचप्रकारे मुंबईत पुढील ८ ते १० दिवसांत कोरोना संक्रमण नियंत्रणात आलं नाही, तर अंशतः लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो, असं सूचक विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे.