महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सांगितलं की, मुंबईत दिवसभरात कोविड -१९ प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांनी २,०००चा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
“गेल्या आठवड्यात, आम्ही दररोज १५० प्रकरणं नोंदवत होतो. आता, आम्ही दररोज सुमारे २,००० प्रकरणे नोंदवत आहोत. मुंबईत आज २,००० प्रकरणे ओलांडू शकतात,” असं शहराच्या पालकमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं.
या बैठकीला पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
#COVID19 | Last week we were reporting 150 cases per day, now we are reporting around 2000 cases per day. Mumbai may cross 2000 per day cases today: Maharashtra Cabinet Minister Aditya Thackeray
— ANI (@ANI) December 29, 2021
(File pic) pic.twitter.com/4Tc7GWvH1W
ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे १,३३३ रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवणाऱ्या दोन शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली देखील आहेत.
आदल्या दिवशी, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात कोविड -19 प्रकरणांमध्ये झालेली वाढ “चिंताजनक” आहे. राज्यात मंगळवारी २,१७२ नवीन कोरोनाव्हायरस रुग्णांची नोंद झाली. यात आतापर्यंत एकूण १६७ ओमिक्रॉन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
दरम्यान, मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशन पार्टीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षानिमित्त होणारे कार्यक्रम, पार्टी रद्द करण्यात येणार असल्याचं मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात आढावा घेतला.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, तरीदेखील काळजी घेणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. कोरोना निर्बंधांचे सर्वांना पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.