मुंबईत प्लास्टिक पिशव्या बंदी लागू करून दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी याच महापालिकेच्या नाकावर टिच्चून दादर रेल्वे स्थानकासमोरच फेरीचा धंदा करत फेरीवाले प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांमधून भाजी, फळं आणि इतर साहित्य विकलं जात आहे. त्यामुळे एकाबाजूला प्लास्टिक बंदीच्या नावावर दुकानदारांना धमकावणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अनाधिकृत फेरीवाल्यांना अभय दिलं जातं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या आम्ही दुकानांकडे लक्ष केद्रीत केलं आहे. पण फेरीवाल्यांवरही कारवाई केली जाणार आहे. फेरीवाल्यांकडे पाच हजाराच्या दंडाची रक्कम मिळणार नाही. परिणामी मोठा गोंधळ निर्माण होईल, वादविवाद होईल म्हणून प्रथम दुकानदारांवर कारवाई करून फेरीवाल्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. परंतु, त्यानंतरही जर त्यांच्याकडून याचा वापर होणार असेल तर निश्चितच दंडात्मक कारवाई केली जाईल.
- निधी चौधरी, (विशेष) उपायुक्त महापालिका
मुंबईत सरसकट सर्वच प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असून २३ जूनपासून याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरताना आढळल्यास संबंधित दुकानदार, गाळेधारक आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल, असं महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं. परंतु, प्रत्यक्षात दुकानदार, मार्केटमधील गाळेधारक, शॉपिंग सेंटर आणि मॉल्समधील दुकानांची झाडाझडती घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असली तरी प्रत्यक्षात फेरीवाल्यांना मात्र अभय दिला जात आहे.
दादर रेल्वे स्थानकाच्या समोर भाजी, फळ विक्रेते आणि अन्य वस्तूंची विक्री करणारे अनधिकृत फेरीवाल्यांकडून प्लास्टिक बंदीच्या कायद्याचं उल्लंघन करत प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर करत आहेत.
प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे म्हणून वस्तू देण्यास नकार दिला तर आमचा माल विकलाच जाणार नाही. त्यामुळे पातळ पिशव्यांशिवाय पर्यायच नसल्याचं या फेरीवाल्यांचं म्हणणं आहे. शिवाय ही बंदी दुकानदारांसाठी आहे, आमच्यासाठी नाही, असंही ते बोलायला कमी करत नाही.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून एकप्रकारे महापालिकेला आव्हान दिलं जात असताना, दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांनी केवळ डोळ्यावर झापड लावून दुकानदारांना टार्गेट करण्यास सुरुवात केलं आहे. त्यामुळे नक्की ही बंदी कुणासाठी? दुकानदारांसाठी, सामान्य नागरिकांसाठी की सर्वांसाठी असा प्रश्न दादरमध्ये फेरफटका मारताना अनुभवायला मिळत आहे. फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी परवाना विभागातील निरीक्षकांची पथकं सज्ज आहेत. त्यामुळे या परवाना विभागाच्या पथकाकडून फेरीवाल्यांकडून कोणत्याही प्रकारे दंडात्मक कारवाई करून त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार करता आलेलं नाही.