भारतीय हवामान विभागानं मुंबई आणि रायगडमध्ये गुरुवारी रेड अॅलर्टचा इशारा दिला आहे. या रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर मुंबई, ठाण्यासह कोकणातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात येते. त्याचप्रमाणं गुरूवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि रायगडमध्ये गुरुवारसाठी दिलेला रेड अॅलर्ट कायम आहे. पालघर आणि ठाणे इथं गुरुवारी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मुंबईत जोराचा पाऊस झाल्यास चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्राच्या अंतर्भागातही सर्वदूर पाऊस पडला आहे. विदर्भ, कोकण आणि गोवा येथील तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसंच, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारी कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज असून, विदर्भ, मध्य महाराष्ट्र इथं मुसळधार ते अती मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे. मुंबईत शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये या पावसाची उपस्थिती असेल, अशी शक्यता आहे.
हेही वाचा -
ई सिगारेटच्या बंदीवरून ट्वीटरवर मिम्सचा पाऊस, हसून हसून दुखेल पोट