मागील २ दिवस मुंबईत पावसानं तुफान बॅटिंग केली. या मुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून, मुंबईत मागील ४८ तासात तब्बल २४० हून जास्त मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, सद्यस्थितीत पावसानं विश्रांती घेतली असल्यानं मुंबईचे जनजीवन पुन्हा सुरळीत झालं आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या किंग्ज सर्कल, माटूंगा परिसरात कमरेपर्यंत पाणी भरलं. त्यामुळे दुकानदारांनी दुकानं आजही बंदच ठेवली. तसंच, मनपाकडून रस्त्यावर साचलेला गाळ काढण्याचं काम सुरु झालं आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले होते आणि मुंबई बुडाली होती. दादर टीटी सर्कल पाण्याखाली गेलं होत. पण आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दादर परिसरात वाहतूक व्यवस्था आणि दुकान पूर्ववत सुरु झाली आहे.
यंदा परळ-लालबाग परिसरातील दामोदर नाट्यगृहाचा रंगमंच पाण्याखाली गेला होता. नाट्यगृहातील ज्या खुर्च्यांवर बसून नाट्यविष्काराचा आस्वाद प्रेक्षकांनी घेतला; त्या खुर्च्या साचलेल्या पावसाच्या पाण्यात बुडाल्या होत्या. कोरोनाच्या संकटकाळात अगोदरच गेल्या ६ महिन्यांपासून नाट्यगृहाची किंबहुना नाट्यसृष्टीची आर्थिक बाजू ढासळली आहे.