मुंबईकरांसाठी वाहतूककोंडी नवीन नाही. पण याच वाहतूककोंडीत अडकून मुंबईकरांचा ६५ टक्के अतिरिक्त वेळ खर्च होतो. वाहतूककोंडीच्या बाबतीत मुंबईचा जगात चौथा क्रमांक लागत असल्याचं वास्तव एका खासगी संस्थेच्या अहवालातून समोर आलं आहे. ‘टाॅमटाॅम ट्राफिक इंडेक्स’ने जगातील सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या शहरांचा सर्वेक्षण अहवाल नुकताच सादर केला आहे.
जगातील १० शहरांच्या या यादीत भारतातील ४ शहरांचा समावेश आहे. त्यात बंगळुरू हे भारतीय शहर पहिल्या क्रमांकावर आहे. यातून भारतातील वाहतूककोंडीची समस्या कळू शकते. या यादीत पुणे शहर पाचव्या तर दिल्ली शहर आठव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा- मुंबईकरांचा दररोज दीड तास वाहतूककोंडीत वाया!
'टॉमटॉम' लोकेशन टेक्नॉलॉजी ही कंपनी अॅपल आणि उबेरसाठी नकाशा तयार करण्याचं काम करते. देशातील ४०३ शहरांमधील वाहतूककोंडीचा जीपीएसच्या आधारे अभ्यास करून कंपनी दरवर्षी 'ट्रॅफिक इंडेक्स' हा अहवाल तयार करते. या अहवालात वाहतुकीचा वेग आणि वाहतूककोंडीबाबत पाहणी करण्यात येते. वाहतूककोंडीमुळे कोणत्याही शहरात पोहोचायला किती वेळ लागतो हे तपासण्यात येतं. या अहवालानुसार मुंबई शहरात वाहतूककोंडीची समस्या भयंकर आहे. मुंबईत वाहतूककोंडीतून वाट काढत निर्धारित स्थळी पोहोचायला ६५ टक्क्यांहून जास्त अतिरिक्त वेळ लागतो.
या कंपनीचे प्रमुख निक कोन्ह म्हणतात, जागतिक स्तरावर वाहतूककोंडीच्या निर्माण झालेल्या समस्येकडे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूने बघता येतं. जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था वाढत असल्याचं हे निर्दशक आहे. तर दुसऱ्या बाजूला वाहतूककोंडीत वाहनचालकाचा विनाकारण वेळ वाया जात असल्याने ही वाहतूककोंडी वाईट ठरते.
हेही वाचा- सायन पुलाच्या दुरुस्तीचं काम, पुन्हा वाहतूककोंडीची शक्यताया वाहतूककोंडीतून वाचण्यासह प्रदूषणाचे प्रमाण कमी करायचं असेल तर मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी लागेल, असं मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.