
मुंबईतील वाहनतळाच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून शहरातील प्रत्येक प्रशासकीय वॉर्डमध्ये एक अशा एकूण 27 भूमिगत पार्किंग प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली.
या प्रकल्पासाठी प्रत्येक वॉर्डमधील योग्य मोकळ्या जागांची निवड करण्याची जबाबदारी संबंधित आमदार आणि स्थानिक नगरसेवकांवर सोपविण्यात आली आहे.
सध्या मुंबईत 50 लाखांहून अधिक नोंदणीकृत वाहने आहेत. दररोज सुमारे 728 नवीन वाहनांची भर पडत असताना, पार्किंगची सुविधा त्यानुसार वाढलेली नाही. परिणामी अनेक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असून वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनत आहे.
ही समस्या सोडवण्यासाठी उद्याने आणि खेळाच्या मैदानांच्या खाली भूमिगत पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे अतिरिक्त जमीन संपादित करण्याची गरज भासणार नाही, असे अमित साटम यांनी सांगितले.
महापालिकेच्या अर्थसंकल्पातून निधी
या प्रकल्पाची घोषणा प्रथम मे महिन्यात करण्यात आली होती. बृहन्मुंबई महापालिकेवर (बीएमसी) सत्ता आल्यानंतर महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीचा अहवाल सादर करताना हा प्रस्ताव जाहीर करण्यात आला होता.
बीएमसीच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मोकळ्या जागांच्या खाली भूमिगत पार्किंग उभारून मुंबईतील पार्किंगची समस्या कमी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
साटम यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या धोरणाला आता नव्याने गती देण्यात येत आहे. हे धोरण त्या वेळी प्रत्यक्षात आले नव्हते.
सध्या बीएमसीकडे मुंबईभर 37 अधिकृत पार्किंग सुविधा असून त्यांची एकूण क्षमता 30 हजार 135 वाहनांची आहे.
सुरू असलेले पार्किंग प्रकल्प
गेल्या महिन्यात दादर पश्चिम येथील जगन्नाथ सावंत रोडवरील सार्वजनिक पार्किंगचे पुनर्विकास काम सुरू करण्यात आले. या आधुनिक पार्किंगमध्ये सुमारे 1,000 वाहनांची क्षमता असेल.
याशिवाय, दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक (फ्लोरा फाउंटन) येथे बीएमसीचे पहिले भूमिगत रोबोटिक पार्किंग उभारले जात आहे. सुमारे 200 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात चार भूमिगत मजले असतील आणि 194 कार पार्क करण्याची क्षमता असेल. स्वयंचलित लिफ्ट प्रणालीद्वारे अवघ्या तीन मिनिटांत वाहन पार्क किंवा बाहेर काढता येणार आहे.
कोस्टल रोडलगत वरळी डेअरी आणि वरळी सी-फेस (बिंदू माधव ठाकरे चौकासमोर) येथे प्रत्येकी 200 वाहन क्षमतेची दोन भूमिगत पार्किंग केंद्रे पूर्ण झाली आहेत. तसेच हाजी अली येथील लोटस जेटी येथे 1,200 वाहन क्षमतेचे आणखी एक भूमिगत पार्किंग उभारण्याचे काम सुरू आहे.
मात्र, यापूर्वी वांद्रे येथील रावसाहेब पटवर्धन उद्यान आणि जुहू येथील पुष्पा नरसी उद्यानाच्या खाली भूमिगत पार्किंग उभारण्याचा बीएमसीचा प्रस्ताव स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर 2024 मध्ये मागे घेण्यात आला होता.
हेही वाचा
