मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये झालेल्या मुबलक पावसामुळे तलावाची पातळीत कमालीची वाढ झालीय. त्यामुळे सर्व तलावांमधील वर्षभराचा पाण्याचा कोटा फुल झाला असून मुंबईकरांचं यंदाचं पाण्याचं टेंशन खल्लास झालंय.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर सागर, मोडकसागर, भातसा, विहार, तानसा, तुळशी, मध्य वैतरणा आदी सात तलावांमध्ये एकूण १,३९,३८२ कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झालाय. मुंबईकरांना पुढील ३६६ दिवस पुरेल इतकं हे पाणी असून सप्टेंबरमध्ये ही तलाव फुल्ल झाल्यामुळे महापालिकेचेही अधिकारी काहीसे चिंतीत आहे. त्यामुळे आतापर्यंत वापरलं जाणारं पाणी पुन्हा भरण्यासाठी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडून पाण्याचा कोटा फूल होणं आवश्यक आहे.
१ ऑक्टोबरला पाण्याचा जो साठा असेल तोच पुढील वर्षभराची तहान भागवणारं असल्यामुळे सध्या जरी तलाव पाण्यानं भरलेली दिसली तरी पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळून तलाव भरली जावी, अशी मनोमनी आर्जवी महापालिकेचे अधिकारी करताना दिसतात. या सातही तलावांमधून दररोज ३८० कोटी लिटर पाणीपुरवठा केला जातो. या ३८० कोटी पैकी १५ कोटी लिटर एवढं पाणी भिवंडी आणि ठाणे महापालिकेला दिलं जातं. मुंबईला ३१ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलावांत मिळून १,४४,७३६ कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असते. यावर्षी तलाव क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ४ सप्टेंबर रोजी १,३९,३८२ कोटी लिटर एवढा पाणी साठा सर्व तलावांमध्ये जमा झालाय.
धरण | पाणी साठा (कोटी लिटर) |
अप्पर वैतरणा | २१३०६ (९३.८४ टक्के) |
मोडक सागर | १२८१७ (९९.४२टक्के) |
तानसा | १४३४१ (९८.८५ टक्के) |
मध्य वैतरणा | १८६८४ (९६.५४ टक्के) |
भातसा | ६८६५८ (९५.७५ टक्के) |
विहार | २७६९ (१०० टक्के) |
तुलसी | ८०४ (१०० टक्के) |
एकूण | १३९३८२ (९६.३० टक्के) |