Advertisement

आग ही आग! १० वर्षांत मुंबईत ४८, ४३४ आगीच्या घटना

मुंबईत गेल्या १० वर्षांत ४८ हजार ४३४ आगीच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराखाली उघड झाली आहे. या आगीमध्ये १० वर्षांत ६०९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

आग ही आग! १० वर्षांत मुंबईत ४८, ४३४ आगीच्या घटना
SHARES

गेल्या वर्षी कमला मिलला लागलेल्या मोठ्या आगीनंतर मुंबईतील आगीच सत्र सुरूच आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास वांद्र्यातील नर्गिस दत्त नगरला भीषण आग लागून हाहाकार माजला. याचप्रकारे मुंबईत गेल्या १० वर्षांत ४८ हजार ४३४ आगीच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराखाली उघड झाली आहे. या आगीमध्ये १० वर्षांत ६०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूणच आगीच्या घटना रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.


अग्निशमन दलाची माहिती

माहिती अधिकार कार्यकर्ते शकिल अहमद यांनी २००८ पासून जुलै २०१८ पर्यंत मुंबईत लागलेल्या आगीची माहिती मागितली होती. त्यानुसार अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीप्रमाणे २००८ ते जुलै२०१८ पर्यंत मुंबईत ४८ हजार ४३४ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यात १ हजार ५६८ आगीच्या घटना या गगनचुंबी इमारतीतील असून ८ हजार ७३७ आगी या रहिवाशी इमारतींना लागलेल्या आहेत. तसंच ३ हजार ८३३ व्यावसायिक इमारतींना आग लागल्याच्या घटना आहेत. तर ३ हजार १५१ घटना या झोपडपट्टींमधील आगीच्या आहेत.


शाॅर्ट सर्किटमुळे आगीच्या घटना

मागील १० वर्षांत लागलेल्या आगीसाठी शाॅर्ट सर्किट हे आगीचं महत्त्वाचं कारण असल्याचीही बाब यातून समोर आली आहे. कारण ४८ हजार ४३४ घटनांपैकी तब्बल ३२ हजार ५१६ आगीच्या घटना या शाॅर्ट सर्किटमुळं लागल्या आहेत. त्याचवेळी ११ हजार ८८९ घटना या गॅस सिलेंडर लिकेजमुळे झालेल्या आहेत. या आगीच्या दुर्घटनांमध्ये ६०९ लोकांचा यात मृत्यू झाला असून यात २१२ पुरूष तर २१२ स्त्रियांचा समावेश आहे. या आगीत ८९०४८६१०२ रूपये इतकं आर्थिक नुकसान झालं आहे.


प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष

आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून विकसित होत असलेल्या मुंबईसारख्या शहरात इतक्या मोठ्या संख्येने आगीच्या दुर्घटना घडत आहेत. त्या शेकडो लोकांचा बळी जात आहे, पण त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मात्र महापालिका प्रशासन असो वा अग्निशमन दल वा राज्य सरकार कुणाकडूनच ठोस पाऊल काही उचलली जात नसल्याचं म्हणत याबाबत शकील अहमद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तर, महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवरक्षक अधिनियम २००६ ची अमंलबजावणी अग्निशमन दलाकडून का करण्यात येत नाही असाही सवाल शकील अहमद यांनी केला आहे. अग्निशमन दलाला पत्र लिहित या नियमांची त्वरीत अंमलबजावणी सुरू करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.



हेही वाचा-

वांद्र्यातील नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग

मालाडच्या मढ जेट्टीत आग, ३० झोपड्या जळून खाक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा