काही दिवसांपूर्वी मुंबईत चिघळत चाललेलं कोरोना विषाणू प्रादुर्भावाचं संकट हळुहळू आटोक्यात येताना दिसत आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढही काही प्रमाणात स्थिरावलेली दिसत आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या मेहनतीचंच हे फळ असून यासंदर्भातील व्यवस्थापनाचं नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही कौतुक केलं आहे.
“केंद्रीय पद्धतीने बेडचं वाटप, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणं, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचंही वाटप करणं आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणं, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम कार्यान्वित करणं. मुंबईचं कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचं अभिनंदन,” अशा शब्दात नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी मुंबई महापालिका प्रशासन आणि आयुक्तांचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकेचं कौतुक, भाजप मात्र विरोधाचीच ढोलकी बडवतंय- महापौर
Centralized bed allotment, anticipating oxygen storage facilities, common allotment of beds even in pvt hospitals, dashboards for monitoring , war rooms for patient follow up. Inspirational Mumbai model of Covid Mngmnt . Congrats @mybmc Commissioner Chahal & his Gr8 team. pic.twitter.com/WHE8P62137
— Amitabh Kant (@amitabhk87) May 9, 2021
मागे दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कोरोना व्यवस्थापन मॉडेलचं उदाहरण दिलं होतं. सर्वोचा न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती. एम. आर. शाह यांच्या दोन सदस्यीय खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोरोना व्यवस्थापनासंदर्भात मुंबई महापालिकेनं तयार केलेलं मॉडेल देश आणि राज्यस्तरावर राबवणं शक्य आहे का?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली होती. प्रामुख्याने दिल्लीतील प्रशासनाने या मॉडेलचा अभ्यास करण्याची सूचनाही केली होती.
तर मुंबई उच्च न्यायालयाने देखील पुणे, ठाणे, नागपूर इत्यादी जिल्ह्यात कोरोनाचं संकट हाताळण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्याविषयीची सूचना केली होती.
मुंबई महापालिका प्रशासनाने शहर आणि उपनगरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता ताबडतोड बेड्सची संख्या वाढवत ठेवण्याचं धोरण अवलंबिलेलं आहे. शहरात आणखी जम्बो कोविड सेंटर उभी रहात आहेत. आॅक्सिजन वाटपासाठी व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे. रेमडेसिवीर इ. सारख्या औषधांचा कोटा रुग्णालयांना देण्यात येत आहे. तसंच सर्वसामान्यांच्या मदतीसाठी चोविस तास वाॅर रूम सुरू ठेवण्यात आलेला आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
(niti aayog ceo amitabh kant praises mumbai model of bmc for covid 19 pandemic management )