डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी (६ डिसेंबर) चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने जनसमुदाय बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल होतो. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर अनेक कार्यक्रमही होत असतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी न करता घरी राहूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं, अशी विनंती मुंबई महापालिका आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अनुयायांना केली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसंच कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनासह मुंबई महापालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनुयायांना चैत्यभूमीवर यंदा प्रवेश दिला जाणार नाही. त्याऐवजी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण केलं जाईल.
हेही वाचा- १ लाखाहून अधिक नागरिकांची मुंबईत मोफत कोरोना चाचणी
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महापालिकेने चैत्यभूमी परिसरात किरकाेळ दुरूस्ती, पुष्ट सजावट, रंगरंगोटी, दिवाबत्ती इ. कामे हाती घेतली आहेत. या कामांचा आढावा नुकताच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांनी घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी इथं शासकीय मानवंदना प्रदान करून हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
मात्र कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचं पालन करता यावं, कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध असतील. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं अनुयायांना कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. केवळ शासकीय मानवंदना कार्यक्रमाचं आॅनलाइन व प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
हेही वाचा- कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता; राज्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ