गेल्या ऑगस्ट सप्टेंबर, महिन्यात राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पावसाचा जोरदार फटका हा कांदा उत्पादकांना बसला. कांद्याने पार शंभरी गाठली. कांद्यांच्या वाढत्या किंमती ग्राहकांना न परवडणाऱ्या झाल्या. मात्र कांदा पुन्हा सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे. कांद्याचे दर पुन्हा वाढले आहेत.
राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक ५० ते ६० टक्क्यांनी घटली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात कांदा महाग झाला आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांद्यावर झाला आहे. किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये प्रति किलो झाली आहे. तर कांद्याचे घाऊक दर ४० ते ४५ रुपये प्रति किलो आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे पुढच्या काळात कांद्याचे दर आणखी वाढू शकतात.
सध्या घाऊक बाजारात १० किलो कांद्याला ३०० ते ४०० रुपये दर मिळत आहे. पुणे, नाशिक, वाशी मार्केटमध्ये हळवी कांद्याची आवक होत आहे.
गेल्या काही महिन्यात कांद्याने शंभरी गाठली होती. २०२०मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी काढलेली पिके वाय गेली. या सगळ्याचा फटका उन्हाळी कांद्याचा रोपांना बसला. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे कांदा लागवड करण्याचा हंगाम लांबणीवर पडला. त्यामुळे आता बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे दर वाढताना दिसत आहेत.