Advertisement

किराणा, भाजीपाला, लोकलवर आणखी कडक निर्बंध येणार!

सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले

किराणा, भाजीपाला, लोकलवर आणखी कडक निर्बंध येणार!
SHARES

राज्यातील कोरोना उद्रेकाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. मात्र त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिले आहेत. त्यानुसार किराणा, भाजीपाला आणि लोकल प्रवासावर पुन्हा कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. 

राज्यात १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू झाली. ही संचारबंदी पुढील १५ दिवस म्हणजे १ मे पर्यंत लागू असणार आहे. मात्र कलम १४४ लागू असतानाही संचारबंदीच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य जनता भाजीपाला, किराणा घेण्यासाठी गर्दी करताना तसंच ट्रेनमधून प्रवास करताना आढळून आली. आवाहन करूनही लोकं ऐकत नसल्याने राज्य सरकारने आता कडक पवित्रा घेण्याचं ठरवलं आहे. 

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी संचारबंदी लागू करण्याची घोषणा करतानाच लोकांना अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं होतं. संचारबंदी लागू करताना सार्वजनिक वाहतूक सेवा सुरूच ठेवल्याने अजूनही लोकांना या संचारबंदीचं गांभीर्य कळलेलं दिसून येत नाहीय. 

हेही वाचा- कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

पेट्रोल पंपही बंद

रस्त्यावरील गर्दी जर कमी झाली नाही, तर प्रसंगी अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात यावी, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता कडक लाॅकडाऊन असलंच पाहिजे, असं मला वाटतं. इतर राज्यांमध्ये लाॅकडाऊन लावताना तिथं पेट्रोल-डिझेल पंपही बंद करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच तहसीलदाराकडून मिळणाऱ्या पासवर इंधन दिलं जात आहे. गाडीत पेट्रोल-डिझेलच नसेल, तर गाड्या बाहेर कशा निघतील? त्यामुळे विनाकारण बाहेर फिरण्याची आता जी मोकळीक आहे, ती राहणार नाही.

२ दिवसांत निर्णय

लोकांना विनंती करूनही जर लोकं अशा पद्धतीने वागणार असतील, तर हजारो लोकांचे जीव वाचवण्यासाठी येत्या २ दिवसांत मुख्यमंत्री स्वत: यासंदर्भात कडक भूमिका स्वीकारतील. याआधी रात्रीची संचारबंदी होती, ती दिवसाची केली. लोकांना आपापल्या गावी जाता यावं, प्रवासी, मजूर, पाहुणे या सगळ्यांना जाण्यासाठी जरी आज सूट देण्यात आली असली, तरी उद्यापासून निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी अजिबात घराबाहेर पडू नका, असं माझं जनतेला आवाहन आहे.

सध्या औषधांच्या दुकानांसोबतच किराणा, भाजीपाला सुरू असला, तरी तो घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडताना दिसले. त्यामुळे यापुढे नियमानुसार सक्तीने कारवाई करण्यात येईल. आवश्यकता वाटल्यास लोकलबाबतही चर्चेतून निर्णय घेतला जाईल.

(people must follow lockdown rules says vijay wadettiwar)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा