रविवारी देशभरात पेट्रोलचे दर २७ पैशांनी, तर डिझेलचे दर १८ पैशांनी वाढवण्यात आले. यामुळे मुंबईमध्ये १ लिटर पेट्रोलचा दर ७९.२९ रुपयांवर, तर १ लिटर डिझेलचा दर ७०.०१ रुपयांवर पोहोचला आहे. इंधनदरांत १७ सप्टेंबरपासून सलग ६ दिवस वाढ झाली आहे. या ६ दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे १.५९ व १.३१ रुपयांनी वाढ झाली आहे.
सौदी अरेबियातील ‘अरामको’ या सर्वांत मोठ्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर १४ सप्टेंबरला झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर वाढत राहिल्यास येत्या काळात देशातील इंधनाच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
‘अरामको’वर झालेल्या हल्ल्यापासून इंधन उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. या हल्ल्यानंतर ‘अरामको’चं दैनंदिन इंधन उत्पादन ६० टक्क्यांनी म्हणजेच ५७ लाख बॅरलने घटलं आहे. जागतिक बाजारात सौदी अरेबियाकडून ५ टक्के इंधन पुरवठा होतो. त्यामुळे हे घटलेलं उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत हे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
भारत आपली गरज भागवण्यासाठी ८३ टक्के इंधनाची आयात करतो. भारत सौदी अरेबियाकडून दर महिन्याला २० लाख टन इंधन, २ लाख टन एलपीजी आयात करतो. सौदी अरेबिया भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा इंधन पुरवठादार देश असल्याने भारताला त्याचा मोठा फटका बसत आहे.
हेही वाचा-
काॅर्पोरेट करात कपात, केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा
खूशखबर! पीएफवर मिळणार ८.६५ टक्के व्याज