मुंबईतल्या गोरेगाव येथील आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमींसह अनेकांनी आंदोलन केली. त्यावेळी या आंदोलकांना पोलीसांनी अटक केली. अटक केल्यानंतर पोलीसांनी आंदोलकांची कपडे काडून तपासणी केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अटक झालेल्या श्रुती नायर हिनं माहिती दिली.
'मी उद्योजिका आहे. मला जगण्यासाठी ऑक्सीजन महत्त्वाचा आहे आणि त्याची किंमत कळली आहे म्हणून मी झाडं वाचवायला आरेमध्ये गेले होते. याची शिक्षा मला तुरुंगात पाठवून, माझे कपडे उतरवून माझी तपासणी करून मला देण्यात आली' असं श्रुती नायरनं गुरुवारी मुंबई प्रेस क्लब इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं. श्रृतीसोबत इतर अटक झालेल्या २८ आंदोलकांनीही आपले अनुभव सांगून पर्यावरण रक्षणासाठी घोषणा देणं, गाणी म्हणणं यासाठी सराईत गुन्हेगारासारखी शिक्षा मिळणं न्याय्य आहे का, असे प्रश्न उपस्थित केले. तसंच, हे गुन्हे हटवावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पोलिसांनी दिलेल्या वागणुकीत गालावरही ओरखडल्याचं श्रुती यांनी म्हटलं. तसंच, आरेतील आदिवासी स्थानिकांनी आंदोलना दरम्यान पोलिसांशी झालेल्या झटापटीत मुली जखमी झाल्याची तक्रार केली. केवळ आरेवर प्रेम करणाऱ्यांनी नाही, तर सगळ्याच मुंबईकरांनी मुंबईतील उर्वरित झाडं वाचवायला हवी, असं आवाहन केलं आहे.
या अटकेनंतर पोलिसांनी आंदोलकांना खुनी, बलात्कार करणारे यांच्यासोबत २ रात्री ठेवलं होतं. त्यानंतर या तरुण आंदोलकांना 'अर्बन नक्षल', 'विकासविरोधी', 'धर्मविरोधी', 'परदेशातून आलेल्या पैशांच्या बळावर मोठं झालेलं' अशा अनेक पद्धतीनं संबोधण्यात येत आहे. मात्र, या प्रत्येकाची पार्श्वभूमी तपासली तर आरोप करणाऱ्यांइतकंच ते सामान्य आहेत हे लक्षात येईल. त्यामुळं आंदोलकांना खुनी, बलात्कार करणारे यांच्यासोबत २ रात्री ठेवून सरकारनं नेमकं काय मिळवलं, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा -
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पदार्थांवर जीएसटी नाही
भिवंडीमध्ये खड्डा चुकवताना डॉक्टर तरुणीचा मृत्यू