वरळी कोळीवाड्याजवळ असलेल्या नौदलाच्या टेहळणी बुरुजाची १० फुटी संरक्षक भिंत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यामध्ये १५ दुचाकींचं नुकसान झालं आहे. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वरळी कोळीवाड्याजवळील गोलफादेवी मंदीराच्या जवळ गेल्या ५० वर्षांपासून नौदलाचा टेहळणी बुरूज आहे. या बुरुजाला लागून २२५ मीटर लांबलचक व १० फूट उंच संरक्षक भिंत असून तिचा काही भाग रात्री ढासळला.
या धोकादायक भिंतीबाबत वारंवार कोळीवाड्यातील रहिवाशांनी वारंवार तक्रार केल्या आहेत. मात्र, महापालिका व नौदलानं याकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या टेहळणी बुरुजाला व संरक्षक भिंतीला अनेक भेगा पडल्याचं समजतं. पावसाळ्यात भिंत किंवा बुरूज पडून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता येथील रहिवाशांनी वर्तवली होती.
याबाबच पत्रही मुख्यमंत्री कार्यालयाला, पालिका आयुक्तांना व नौदलाला पाठवण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती मिळते. सोमवारच्या दुर्घटनेत १० फुटाची भिंत कोसळली तेव्हा कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी भविष्यात हा ४० फूट बुरूज कोसळल्यास मात्र खूप अनेकांचे जीव जातील, अशी भीती येथील रहिवाशांनी वर्तवली आहे.
हेही वाचा -
सप्टेंबरमध्ये लोकल सुरू होण्याची शक्यता
कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात तब्बल ५७.७६ टक्के वाढ