माहिम परिसरातील नरसंजीवाडी येथे राहणाऱ्या फर्नांडिस कुटुंबाला गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेचं शौचालय वापरु दिलं जात नाहीये. याविषयी महापालिका आयुक्तांनी आदेश देऊनही हे शौचालय आमच्या वापरासाठी खुलं करून दिलं जात नसल्याचा आरोप फर्नांडिस कुटुंबियांनी केला आहे. अनेकदा तक्रार करुनही कुणीच यावर कारवाई करत नसल्याची प्रतिक्रिया उपासना फर्नांडिस यांनी दिली आहे.
माहिमच्या नरसंजीवाडी परिसरात काही मुलं नेट लावून टेनिस खेळत असतात. त्यामुळे परिसरात प्रवेश करण्याचा रस्ता बंद झाला असल्याची तक्रार उपासना फर्नांडिस यांनी फेब्रुवारी महिन्यात दाखल केली होती. त्यावेळेस उपासना फर्नांडिस यांनी तिथे खेळत असलेल्या काही मुलांविरोधात देखील तक्रार केली होती. त्यानंतर तिथे लावण्यात आलेला नेट काढण्यास सांगितले आणि मुलांना खेळण्यासाठीही बंदी घातली. तिथेच एका मुलाची आई अलझिरादेखील होती. तिने उपासना यांना थांबवलं आणि त्याचाच बदला म्हणून पालिकेच्या 4 शौचालयाला कुलप लावलं. तसंच हा सर्व प्रकार घडल्यानंतर उपासना यांनी कंट्रोल रुमला बोलावून अलझिरा यांना कुलूप तोडायला सांगितलं. पण, त्यांनी दिलेले आदेशही अलझिरा यांनी मानले नाही. त्यानंतर उपासना यांनी अलझिरा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तसंच याप्रकरणी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आतापर्यंत 3 वेळा लावलेलं कुलूप तोडण्यात आलंय. फर्नांडिस कुटुंबियांचं म्हणणं आहे की कुलूप लावण्यात आलेलं शौचालय खुलं करून द्यावं. तसंच, आम्हाला शेजारी राहणाऱ्या अलझिरा नावाच्या महिलेपासून खूप त्रास होत आहे. हा वाद आपापसातला असेल तर तो तिथेच थांबवावा आणि लवकरात लवकर आमच्या हक्काच्या शौचालयाचं कुलूप तोडून आम्हाला ते वापरासाठी खुलं करुन द्यावं.
उपासना यांच्या घरासमोर पालिकेचे 4 शौचालय आहेत. तेच शौचालय ते गेली कित्येक वर्ष वापरत होते. तसंच ते शौचालय त्यांच्या घरापासून एक मिनिटाच्या अंतरावर आहेत. पण, गेले 2 महिने हे शौचालय तर खुले केले गेले नाहीच, तसंच या शौचालयाच्या कुलुपाची चावी देखील या कुटुंबाला दिली जात नाही. याचा त्रास फर्नांडिस कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
तर, याविषयी जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ‘आम्ही आमचं काम करतोय पण, त्यांचं आपापसात भांडण असल्यामुळे हा वाद होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
पालिकेने दिलेल्या आदेशानंतर आम्ही लगेचच टॉयलेटचं कुलूप तोडलं. पण टॉयलेटला पुन्हा परत कुलूप कोण लावतं हे आम्हाला माहीत नाही. आमच्यासाठी टॉयलेटचं कुलूप तोडण्याचं काम अगदी 10 मिनिटांचं आहे. त्यासाठी आम्ही महिलांचीच टीम नेमली आहे. तसंच या परिसरात राहणाऱ्या कोणालाच या टॉयलेटपासून त्रास नाही. फक्त उपासना फर्नांडिस यांनाच हा त्रास आहे. बाकी रहिवासी खूष आहेत. आतापर्यंत 3 वेळा टॉयलेट्सचं कुलूप तोडण्यात आलं आहे. फर्नांडिस यांच्या घरासमोर 6 टॉयलेट आहेत, तरी त्यांना त्या टॉयलेटमध्ये जायचं नाही. जी व्यक्ती ही तक्रार करत आहेत त्या स्वत:च या टॉयलेटचा मेंटेनन्स भरत नाहीत. ’
- रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर विभाग
तर, या विषयी अलझिरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलायला नकार दिला आहे.