मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली असेल, तर त्याविरोधात आधी पोलिसांत जा, खाद्यपदार्थ विक्रीसंदर्भातील जनहित याचिकेशी काहीही संबंध नसल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं मल्टिप्लेक्स मालकांना पुण्यात झालेल्या मारहाणप्रकरणी दिलासा देण्यास सोमवारी स्पष्ट नकार दिला.
मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास मज्जाव केला जात असल्यावरून गेल्याच आठवड्यात याबाबतच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वीच पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये मनसे स्टाईल आंदोलन करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती.
या मारहाणीनंतर मल्टिप्लेक्स मालकांनी खाद्यपदार्थ विक्रीसंदर्भातील जनहीत याचिकेच्या सुनावणीदरम्यान पुण्यातील मारहाणीची कैफियत मांडली. प्रकरण न्याप्रविष्ट असताना धमक्या देत कर्मचाऱ्यांना मारहाण करणं योग्य नसल्याचं म्हणत मालकांनी अशा मारहाणीला आळा घालण्यासंबंधी आदेश देण्याची न्यायालयाकडे मागणी केली.
मात्र, न्यायालयानं आपल्या आदेशात कोणतेही बदल करण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडं मारहाण होत असल्यास न्याय मागण्यासाठी पोलिसांत जाण्याचा पर्याय असल्याचं म्हणत मालकांना पोलिस ठाण्यांचा रस्ता दाखवला आहे.
हेही वाचा-
चारकोपमधील 'या' ३ सिनेमागृहात बिनधास्त न्या घरचं खाणं-पिणं!
मल्टिप्लेक्समध्ये ५ रुपयांचं पॉपकॉर्न २५० रुपयांत का?, न्यायालयानं सरकारला झापलं