राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर आहे. राज्यात पोलीस दलात तब्बल १२ हजार ५३८ जागा भरल्या जाणार आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख या भरतीची घोषणा केली आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात केली जाणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, राज्य सरकार पोलीस विभागातील १२ हजार ५३८ जागा भरणार आहेत. त्याचा पहिला टप्पा सुरु करण्यात येणार असून यामध्ये सुरुवातीला ५२९७ जागा भरण्यात येणार आहेत. याचा फायदा एसईबीसीतील उमेदवारांना व्हावा यासाठी नव्याने शुध्दीपत्रक काढले आहे. पहिल्या टप्प्यानंतर लगेचेच पोलीस भरतीचा दुसरा टप्पाही सुरु करण्यात येणार आहे. तसंच १२ हजार ५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी ५ हजार पदे भरण्याबाबत विचार करण्यात येईल, असंही देशमुख यांनी म्हटलं.
गृह विभागाने २०१९ मध्ये पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे.
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी महापालिका करणार २० कोटींच्या मास्कची खरेदी
विनातिकीट प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई