चेंबूरच्या टिळकनगर परिसरात सरगम सोसायटीला लागलेल्या आगीत गुरूवारी ५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात विकासकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इमारतीला ओसी आणि अग्निप्रतिबंधक व्यवस्था नसताना रहिवाशांना रहायला दिल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
टिळकनगर येथील सरगम या रहिवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील घरात गुरूवारी संध्याकाळी ७.५१ दरम्यान आग लागली. सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणली आणि जखमींना ताबडतोब रुग्णालयात हलवलं. मात्र तरीही या भीषण आगीत ५ जणांचा मृत्यू झाला.
या आगीप्रकरणी इमारत बांधणारा बिल्डर हेमंत माफरा याच्याविरोधात टिळक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या इमारतीला महापालिकेकडून आॅक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) देण्यात आलं नव्हतं. तरी देखील विकासक हेमंत माफराने ही इमारत रहिवाशांना राहण्यासाठी दिली. त्याचबरोबर इमारतीत अग्निसुरक्षेबाबत कोणतीही खबदारी घेण्यात आली नव्हती.
याबाबत इमारतीतील रहिवाशांनी पत्र लिहून महापालिकेच्या अग्निशमन दलाचं लक्ष देखील वेधलं होतं. परंतु महापालिकेने अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली. महापालिका किंवा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केली असती, तर या आगीत दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झाला नसता, असं रहिवाशांनी सांगितलं.
हलगर्जीपणामुळे इमारतीतील रहिवाशांच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून टिळकनगर पोलिस ठाण्यात विकासकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा-
चेंबूरच्या आगीत ५ जणांचा मृत्यू
Video: गोरेगावात दुमजली घर कोसळून तिघांचा मृत्यू