मुंबईकरांना पदपथावरुन चालताना कोणलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून पादचारी प्रथम (पेडीस्ट्रीयन फर्स्ट) हे धोरण तयार करण्यात अालं अाहे. मात्र, या योजनेची अंमलबजावणी कुठंही होताना दिसत नसल्याचं सांगत सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी पादचारी प्रथम हे धोरणच फेल ठरल्याचा आरोप केला आहे. महापालिका केवळ मार्गाच्या दुरुस्तीवरच लक्ष केंद्रीत करत असून पदपथाच्या दुरुस्तीकडे लक्षच दिलं जात नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
मुंबई महापालिकेच्या हद्दीमधील पदपथांची दुरुस्ती करण्याकरता प्रशासनाने एक वेगळी यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी रईस शेख यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ तयार केले असले तरी सद्यस्थितीत मुंबईमधील पदपथांची अवस्था दयनीय झालेली आहे. अनेक पदपथावरील पेव्हर ब्लॉक उखडले गेले आहेत.
रस्त्यांची कामे तातडीनं होण्यासाठी प्राधान्य क्रम १, २ आणि ३ अशाप्रकारे निविदा काढून कामे हाती घेण्यात आली. त्यानुसार रस्त्यांची कामे केली जात आहे. परंतु रस्त्यांची काळजी घेणाऱ्या प्रशासनाकडून पदपथांच्या दुरुस्ती कामांकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. पावसाळी गटारांची कामे करणाऱ्या पर्जन्य जलविभागाच्यावतीनं फक्त रस्त्यांवर जलवाहिन्या टाकण्याची कामे करण्यात येतात. परंतु पदपथांची कामं करण्यात येत नसल्याचीही तीव्र नाराजी शेख यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -
मिठी नदीचं शुद्धीकरण: पहिल्या टप्प्यात २११ कोटींचा खर्च
मुंबईतील दिव्यांग राहिलेत तीनचाकी स्कूटरपासून वंचित