मिठी नदीतील जलप्रदूषण कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्याचं काम हाती घेण्यात येत आहे. या शुद्धीकरणासाठी तब्बल २११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. फिल्टरपाडा ते पवई जलविभाग यार्ड या परिसरातील सुमारे १.३ कि.मी लांबीच्या मार्गावरील सांडपाणी व मलजल रोखून त्यावरील प्रक्रिया केलेलं शुद्ध पाणी मिठीत सोडलं जाणार आहे. यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून पुढील १५ वर्षे या प्रकल्पाची देखभाल करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारावर राहणार आहे.
मिठी नदीतील पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. एकूण ४ टप्प्यामंध्ये मिठी नदीच्या प्रदूषित पाण्याचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मिठी नदीच्या उगमापासून अर्थात फिल्टरपाडा ते पवई जलविभाग यार्ड या १. ३ किलोमीटर एवढ्या लांबीचं काम हाती घेण्यात येत आहे. यामध्ये मिठी नदीलगत प्रवाहरोधक बांध उभारुन बिनपावसाळी सांडपाणी मलवाहिन्यांमध्ये प्रवाहित करणे, मलवाहिनी टाकणं, मलजल उदंचन केंद्र बांधणं तसंच त्या सांडपाणी व मलजलावर त्यावर प्रक्रिया करून ते मिठी नदीत सोडणं आदी प्रकारची काम केली जाणार आहे.
मिठी नदीचं मलजलाचं (सेवेज वॉटर) प्रदूषण रोखण्यासाठी नेमलेल्या फ्रिशमन प्रभू यांची प्रकल्पाबाबतचा अहवाल सादर केल्यांनतर याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. यासाठी स्काय वे इन्फ्रा प्रोजेक्ट ही कंपनी पात्र ठरली आहे. प्रकल्प उभारुन पुढील १५ वर्षांची देखभाल याकरता या सुमारे २११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
हेही वाचा-
नालेसफाईत कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा - महापौर
'मिठी'तलं पाणी होणार स्वच्छ! प्रक्रिया करून नदीत सोडणार