मिठी नदीसह राज्यातील अनेक नद्या शुद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला अाहे. कारण राज्यात लवकरच रशियन कंपनीच्या जलशुद्धीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत ही माहिती दिली. या रशियन जल कंपनीसोबत लवकरच राज्य सरकार करार करणार असल्याच समजत आहे.
सोबतच आगामी काळात रशियन बँक, रशियन निर्यात केंद्र तसेच रशियातील हिऱ्यांच्या व्यापाराची कंपनी ‘अलरोसा’ मुंबईत कार्यालय उघडणार आहे. याशिवाय रशिया भारतासोबत संयुक्तपणे चित्रपट निर्मिती करण्याबाबत चर्चा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. २०१८ हे वर्ष भारत आणि रशिया ‘पर्यटन वर्ष’ म्हणून साजरे करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या कुदाशेव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक स्थळे विकसित असून भारत भेटीवर येणाऱ्या रशियन पर्यटकांनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट द्यावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. यादृष्टीने रशियन पर्यटन कंपनी ‘रॉसटूरिझम’ने मुंबई येथे आपले कार्यालय सुरू करावे, अशीही अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
हेही वाचा -
मिठीचं उगमस्थान झालं मोकळं, अनधिकृत झोपड्यांच्या विखळ्यातून सुटका