मुंबईत एकीकडे लोकांना गाड्या पार्किंगसाठी जागा शोधावी लागते. पण दुसरीकडे मात्र धूळ खात पडलेल्या वाहनांनी मुंबईतल्या 20 एकर जमिनीवर कब्जा केला आहे.
1 जानेवारी 2016 पासून ते 23 अॉगस्ट, 2017 दरम्यान 6,413 बेवारस वाहनांनी मुंबईतील 20 एकर जमीन अडवून ठेवली आहे. पालिकेने मागच्या दोन वर्षांत रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या संदर्भात केलेल्या तपासात अशी माहिती उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पालिकेने आता यातील 2,826 गाड्यांचा लिलाव केला आहे. तर उर्वरित गाड्यांना गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले आहे. पालिकेचं म्हणणं आहे, वर्षानुवर्षे रस्त्यावर उभ्या असलेल्या या गाड्यांमुळे अनेक भागात वाहतूक कोंडी होते, अशी तक्रार लोकांकडून वारंवार केली जात होती.
खरंतर मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या काही नवीन नाही. अनेक ठिकाणी पे अँड पार्कची सुविधा असूनही लोकांना गाडी उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे पालिका आता रस्त्यावर उभ्या असलेल्या या बेवारस गाड्यांंवर लवकरच कारवाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.