मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होऊ लागली आहे. बुधवारी मुंबईमध्ये कोरोनाचे २ हजार ५१० नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर पोलीस व महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबईत गुरुवारी सकाळी मुंबई पोलिसांनी शहरामध्ये कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळं गुरुवार ३० डिसेंबरपासून ते पुढचा शुक्रवारपर्यंत ७ जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असतील असं सांगण्यात आलं आहे.
मुंबईमध्ये लागू करण्यात आलेल्या या आदेशामुळे आता ५ पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच पार्श्वभूमीवर मुंबईत नववर्षांच्या स्वागतानिमित्त मोकळ्या किंवा बंदिस्त जागेमध्ये पार्टी, स्नेहसमारंभ वा अन्य कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी करण्यात आली आहे.
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईतील पार्ट्यांवर बंधन घातल्यानंतर आता रेस्तराँ, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कोणत्याही मोकळ्या अथवा बंदिस्त जागांवर ३० डिसेंबर ते ७ जानेवारीदरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त एकत्र येण्यास परवानगी नाकारण्यात आली.
'३० डिसेंबर २०२१ च्या मध्यरात्री बारापासून सात जानेवारीच्या मध्यरात्री बारावाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागांवर हा आदेश लागू असेल', असं नमूद करण्यात आलं. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अंतर्गत शिक्षेस पात्र ठरतील. याशिवाय महामारी कायदा १८९७ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि इतर कायद्यांखाली कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
Maharashtra | Section 144 imposed in Mumbai starting from today till 7th January 2022, in view of rising Covid cases
— ANI (@ANI) December 30, 2021
Police prohibit New Year's celebrations, parties in any closed or open space incl restaurants, hotels, bars, pubs, resorts & clubs from Dec 30 Dec till Jan 7.
काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे पालिकेने नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने मुंबईत सोहळे, पार्टी, स्नेहसंमेलन, कार्यक्रम अथवा विविध उपक्रमांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. बंदीस्त अथवा मोकळ्या किंवा खुल्या जागेत, मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
नववर्षांच्या स्वागतानिमित्त मुंबईत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये यावर पोलीस दल आणि पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवावे, असे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी समूहाने एकत्र वावरण्यास मनाई करण्यात आली आहे.