Advertisement

शिवसेना सदस्य स्थायी समिती अध्यक्षांवर नाराज होतात तेव्हा...


शिवसेना सदस्य स्थायी समिती अध्यक्षांवर नाराज होतात तेव्हा...
SHARES

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून, खुद्द स्थायी समिती अध्यक्ष शिवसेनेचे असतानाही त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना प्रशासनाकडून निरुत्तर केले जात आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सायन प्रतीक्षा नगरमधील रस्त्याबाबत मंगेश सातमकर यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतरही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले गेले नाही. उलट प्रशासनाच्या या अधिकाऱ्यांना खुद्द अध्यक्षच पाठिशी घालत असल्यामुळे भर सभेतून उठून जाण्याची तयारी दाखवत सातमकर यांनी प्रशासनासह अध्यक्षांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबईतील जी/ उत्तर आणि जी / दक्षिण विभागातील काही रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीला आला असता शिवसेनेचे सदस्य मंगेश सातमकर यांनी सायन प्रतीक्षानगरमधील रखडलेल्या रस्त्याची व्यथा मांडली. या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आल्यानंतर या ठिकाणी मलवाहिनी तसेच पर्जन्य जलवाहिनींची कामे अंर्तभूत न केल्यामुळे मंजूर झालेल्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हे काम अर्धवट बंद पडून असल्यामुळे याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसला आहे. त्यामुळे या रस्त्यांचे काम कधी पूर्ण होणार? असा सवाल सातमकर यांनी केला. वरळीतील बी. जी. खेर मार्गावरील काही भाग आजही अर्धवट आहे. यामुळे रस्ताच बकाल झाला असून, शाखेसमोरील रस्ता असा असल्यामुळे नागरिकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे शिवसेना सदस्य आशिष चेंबूरकर यांनी सांगितले. 

एस. व्ही. रोडपासून अक्साकडे जाणारा 600 मीटरचा पट्टा अजूनही झालेला नाही, अशी खंत शिवसेनेच्या सदस्या राजूल पटेल यांनी व्यक्त केली. परंतु यावर अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन किंवा रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. उलट स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे मंगेश सातमकर यांनी जागेवरुन उठून जाण्याची तयारी दर्शवली. प्रशासनाने किमान आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तरी द्यावीत. परंतु आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेच न देता अध्यक्षांनी त्यांचे प्रस्ताव मंजूर करून टाकणे योग्य नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षांनीही प्रशासनाला याबाबत उत्तर देण्यास न सांगितल्यामुळे सर्वच शिवसेनेच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे एका बाजूला भाजपा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच सदस्यांना संभाळताना अध्यक्षांचा वारू भरकटताना दिसला.

3 जूनपर्यंत 415 प्रकल्प रस्ते होणार पूर्ण -
मुंबई महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या 405 प्रकल्प रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत असून, येत्या 3 जूनपर्यंत ही सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. सध्या 307 रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. पुढील 91 कामे 31 मे पर्यंत आणि उर्वरीत 11 कामे 3 जूनपर्यंत पूर्ण होतील, असे प्रशासनाने म्हटले आहे. प्रधान्यक्रम 1 नुसार हाती घेण्यात आलेल्या 114 रस्त्यांपैकी 92 कामे पूर्ण झालेली आहेत. तर उर्वरीत 22 कामेही 31 मेपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी व्यक्त केला. प्राधान्यक्रम दोन अंतर्गत हाती घेतलेल्या 268 रस्त्यांपैकी 49 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत 219 रस्त्यांची कामे सुरू असून, त्यातील 79 रस्त्यांची कामे 31 मे पर्यंत पूर्ण होतील, असा दावा त्यांनी केला आहे. तर हमी कालावधीतील 81 रस्त्यांची कामेही 31 मे पूर्वी पूर्ण होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा