गुरांचे तबेले मुंबईबाहेर हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आजही मुंबईत अनेक तबेले आहेत. या तबेल्यांच्या जागांवरील बांधकामांसाठी अधिक एफएसआयचा लाभ मिळत नसल्याने या जागांचा विकास केला जात नाही. त्यामुळे तबेल्यांच्या जागांचं आरक्षण बदलून त्यांना अधिक एफएसआयचा लाभ देण्याची मागणी आता नगरसेवकांकडून केली जात आहे.
मुंबईत तब्बल ६४१ तबेले असून त्यांचे क्षेत्रफळ हे सुमारे ६४ हेक्टर्स इतके आहे. पश्चिम उपनगरांतील जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड आणि दहिसर आदी परिसरातील तबेल्यांची संख्या लक्षणीय आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्व तबेले शहराबाहेर हलवणे बंधनकारक असूनही ते अद्यापही स्थलांतरीत करण्यात आलेले नाही.
तबेल्यांच्या विकासासाठी चटई क्षेत्र निर्देशांक(एफएसआय) वाढवून देता येईल आणि तबेल्यांच्या जागांच्या आरक्षणात आवश्यक ते बदल करता येईल अशारितीने महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी ठरावाच्या सूचनेदवारे केली आहे.
हे सर्व तबेले प्रामुख्याने निवासी, व्यावसायिक आणि ना विकास क्षेत्रांमध्ये मोडत असून विकास नियंत्रण नियमावलीत तबेल्यांच्या विकासासाठी केवळ ०.३३ एवढा अतिरिक्त एफएसआय देण्यात आला आहे. हा एफएसआय तबेलाधारक आणि विकासकांना परवडत नसल्यानं तबेल्यांच्या जागांचा विकास होत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तबेल्यांच्या जागांवर विकास नियोजन आराखड्यात ज्या उदिष्टांकरता त्याचा विकास करता येत नाही. शिवाय अनेक वर्षांपासून तबेल्यांचे परवाने देणे बंद केल्यामुळे महापालिकेला त्यांच्यापासून उत्पन्नही मिळत नाही. एवढंच नव्हेतर या तबेल्यांमधील मलमुत्र आणि एकंदरीत साफसफाईचा अभाव यामुळे तबेल्यांच्या परिसरात रोगराईचा प्रसार व प्रदूषणाचा धोका संभावत असल्यामुळे या तबेल्यांच्या जागांचा विकास होणं आवश्यक असल्याचं राजुल पटेल यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -