पुढच्या काही दिवसांत मुंबईकरांना दूध टंचाईचा सामना करावा लागू शकतो. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक पातळीवरील दूध संकलन थंडवलं आहे. परिणामी मुंबईला दूध पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. कोल्हापूर आणि सांगलीमधून दुधाचा एकही टँकर नवी मुंबईत दाखल झालेला नाही. इथूनच हे दूध मुंबईभर पुरवलं जातं.
सांगलीच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील प्रमुख मार्ग महापुराने बंद झाले आहेत. शहरातील स्थानिक दूध डेअऱ्या देखील पाण्यात आहेत. त्याचा दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. वारणा, चितळे, स्वाभिमानी, अमूल, स्फूर्ती अशा डेअऱ्यांकडील दूध पुरवठा थांबला आहे. कोल्हापूर-सांगलीमधून मुंबईत दर दिवशी १३ लाख लीटर दूध दाखल होतं.
सांगली जिल्ह्यात दररोज ५ लाख ९ हजार लिटर दूध संकलन होतं. त्यातील ४ लाख १२ हजार लिटर दूध खासगी डेअऱ्यांमार्फत तर ९७ हजार ५०० लिटर दूध सहकारी डेअऱ्यांमार्फत येतं. मंगळवारी ९० टक्के दूध संकलन घटलं. पुणे, मुंबईकडे जिल्ह्यातून जाणाऱ्या दुधाचे वितरणही अडचणीत आलं आहे. त्यामुळे येत्या २-३ दिवसांत दुधाची टंचाई जाणवू शकते. महापूर असेपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे .
पुराच्या विळख्यात अडकलेल्या ५३ हजार रहिवाशांना सांगलीतून, ११,४३२ रहिवाशांना कोल्हापुरातून आणि ३ हजार रहिवाशांना रायगडमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. स्थानिकांच्या बचावकार्यासाठी नौदल आणि लष्कराची मदत घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक देखील बोलावली आहे.
हेही वाचा-
बकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास सक्त मनाई
मुंबई-नाशिक महामार्ग महिनाभर बंद?