मुंबईत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला सायन उड्डाणपूल २ महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी २० एप्रिलपासून २० जूनपर्यंत हा पूल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं (एमएसआरडीसी) दिली आहे. त्यामुळं या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.
आयआयटी मुंबईनं सायन उड्डाणपुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. त्यावेळी दिलेल्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यामुळं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.
काही दिवसांपूर्वी सायन उड्डाणपुलाच्या प्लास्टरचा भाग कोसळला होता. परंतू, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यामुळं उड्डाणपूल दुरुस्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत येण्या-जाण्यासाठी महत्वाचा उड्डाणपुल असल्यामुळं नेहमीच या ठिकाणी वाहनांची गर्दी असते. मात्र , आता दुरुस्तीसाठी २ महिने बंद ठेवण्यात येणार असल्यानं मुंबईच्या वाहतूककोंडीची समस्या आणखी गंभीर होणार आहे.
हेही वाचा -
सचिननं घेतली शरद पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात
१ हजार वैमानिकांचा संपाचा इशारा, जेटपुढील अडचणी वाढल्या