धोकादायक आणि नुतनीकरणाच्या नावाखाली माटुंगा लेबर कॅम्पमध्ये असलेली राजर्षी शाहू विद्यालयाची इमारत महापालिकेनं तोडली. पण चार वर्ष उलटूनही शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा नारळच फुटत नाहीये.
शाळेच्या जागी मोकळे मैदान असून आजही विदयार्थी आणि पालक शाळेच्या नवीन इमारतीच्या प्रतिक्षेत आहेत. कारण या विभागात पालिकेची एकमेव मोठी आणि अनेक भाषिक शाळा असल्याने हजारो विदयार्थी या शाळेत शिकत होते. सध्या या मुलांसाठी सहा खोल्यांची खुरडी वजा शाळा सुरू केली आहे. पण तिथे विभागातील सर्व मुलांना शिक्षण घेणं शक्य होत नसल्याने आता पर्यायी शिक्षण घ्यायचं कुठे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिलाय.
अनेकदा आरटीआयच्या माध्यमातून यातील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी उडवाउडवीचीच उत्तरं मिळाली. शिवाय शाळा पाडून चार वर्ष झाली असून या मोकळ्या जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
- जॉन सांगळे, सामाजिक कार्यकर्ते
रात्रीच्या वेळी या ठिकाणी दारूड्यांचे वास्तव्य असल्याने या परिसरातील रहिवाशांना त्रासाला समोरे जावे लागत असल्याने लवकरात लवकर शाळेची नवीन इमारत उभी करावी अशी मागणी या विभागातील जनतेने केली आहे.
या संदर्भात जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याकडे विचारणा केली असता, धारावी विकास आराखड्याअंतर्गत आमच्या विभागाने प्रस्ताव पाठवला असून लवकरच शाळेची नवीन इमारत बांधली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.