
राज्यातील (maharashtra) हवामानात सध्या मोठ्या प्रमाणावर बदल होण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यातील कडक उन्हानंतर आता 1 जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन आठवड्यात हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाची दाट शक्यता आहे. मात्र, हा पाऊस मान्सूनचा (monsoon) नसून मान्सूनपूर्व वादळी पाऊस आहे. मान्सून अद्याप केरळमध्येच रेंगाळत असल्याने महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणार (Late) आहे.
आगामी हवामान बदल आणि मान्सून विलंबाने येण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांनी एक जूनपासून सुरू होणाऱ्या केवळ मान्सूनपूर्व (pre monsoon) वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. मान्सूनचे अधिकृत आगमन होऊन पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची भीती असते.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 1 जूनपासून प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर हवामानात मोठे बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होईल.
या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकण किनारपट्टीच्या भागातही काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.
