प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी मुंबईत सुरु झाली अाहे. रविवारी दुपारपर्यंत विविध भागांमध्ये तपासणी पथकांनी ६१७ दुकानांची पाहणी करून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये ४९० किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या अाहेत.
प्लास्टिक बंदीची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर २३ जूनपासून याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. शनिवारी २६९ निरिक्षकांच्या पथकांना प्रशिक्षण दिल्यानंतर रविवारी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. रविवारी दुपारपर्यंत ६१७ दुकानांची पाहणी करण्यात आली. यामध्ये ४० दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. या दुकानांकडून १ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली आहे.
या कारवाईमध्ये ४८५.५५ किलो ग्रॅम एवढ्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, दोन दुकानदारांनी हा दंड भरण्यास नकार दर्शवला असून त्यांच्याविरोधात पुढील कार्यवाही केली जाणार आहे. महापालिकेच्यावतीने परवाना विभाग, बाजार विभाग आणि दुकाने व आस्थापना विभाग आदी तीन विभागांच्यावतीने ही कारवाई होणार आहे.
हेही वाचा -
सोमवारी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी
'आम्ही गिरगावकर' कडून कापडी पिशव्यांचे वाटप