यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. कारण गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतेवेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव महामार्ग पोलिसांनी राज्य सरकारकडं पाठवला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबपर्यंत या मार्गावर टप्प्याटप्प्यानं बंदी लागू होणार आहे. त्यामुंळं यंदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना बाप्पा पावणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कोकणातील प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी प्रत्येक वर्षी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली जाते. यावर्षीही तसा प्रस्ताव सरकारकडं पाठवण्यात आला आहे. ज्या वाहनांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त असेल असे ट्रक, मल्टिएक्सेल, ट्रेलर यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात मुंबई ते गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात एसटी आणि खासगी गाड्या जात असतात. मात्र, या मार्गावरील खड्डे आणि अवजड वाहनांमुळं वाहतुकीचा वेग मंदावत असून मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते.
या प्रस्तावातून भाजीपाला, दूध, पेट्रोल, गॅस सिलेंडर यांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला वगळण्यात आलं आहे. त्याशिवाय, मुंबई ते गोवा महामार्गाचे रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामाशी संबंधित असलेल्या वाहनांनाही या बंदीतून वगळण्यात आलं आहे.
हेही वाचा -
एसी लोकल धावणार सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर?
बेस्ट कामगारांच्या संपाबाबत मंगळवारी मेळावा