मुंबईत ऐन दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अवकाळी पाऊस आणि आवक घटल्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट बिघडलं आहे.
कांदे आधी ३० रुपये प्रति किलो होते ते आता ५५ रुपये किलो झाले आहेत. बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो आधी २० प्रति किलो होते ते आता थेट ८० रुपये किलो झाले आहेत. शिमला मिर्ची, वांगी गवार, भेंडी ८० रुपये किलो विकली जात आहे. प्रत्येक भाज्यांमागे ३० ते ४० रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे.
वाशी इथल्या एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात आवक कमी झाल्यानं दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात वाढ झाल्यानं या सर्व भाज्या किरकोळीत दुप्पट ते तिप्पट दरानं विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्यानं ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे भाजी विक्रेते म्हणत आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर १११.७७ रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी १०२.५२ रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर ११५.७३ रुपये इतका आहे.
तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०५.८४ आणि ९४.५७ रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरू राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईत कोथिंबीरची एक जुडी ६० रुपयाला विकली जात आहे. आधी २० रुपयाला कोथिंबीरची जुडी विकली जात होती.
राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर सध्या नागपुरात विकली जातेय. सध्या नागपूरातील किरकोळ बाजारात कोथिंबीरचा दर ३२० ते ३६० रुपये किलोंवर पोहोचलाय. लांबलेल्या पावसानं पिकांना चांगले झोडपून काढल्यानं कोथिंबीर जागेवरच खराब झालीये.
यासोबतच घरगुती सिलेंडर एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहचलंय. अशात आता भाजीपाल्यानंही महागाईत भर घातली आहे.
हेही वाचा