उत्तराखंडमधील ऋषिकेशला निघालेल्या महाराष्ट्रातील चार यात्रेकरूंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी तातडीने यासंदर्भात कार्यवाही करत अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली.
चार मृत यात्रेकरूंचे मृतदेह मुंबईत आणून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतली. या दुःखद परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी तातडीने केलेली मदत कुटुंबीयांना दिलासा देणारी ठरली आहे.
पालघर जिल्ह्यातील काही यात्रेकरू देव दर्शनासाठी ऋषिकेशला गेले होते. या यात्रेकरूंच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे (वय ४३ वर्षे), वसई येथील धर्मराज खाटेकर (वय ४० वर्षे), दहिसर येथील पुरुषोत्तम खिलखुटी (वय ३७ वर्षे), शिवाजी बुधाकर (वय ५३ वर्षे) यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले.
अपघातातील मृतांचे शवविच्छेदन आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्याच रात्री त्यांचे मृतदेह दिल्ली विमानतळावर आणण्यात आले, तेथून पहाटे त्यांना मुंबईला नेण्यात आले, त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा