मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलवांमधील पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रवरुप क्लोरीनचं दर प्रचंड वाढलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत महापालिकेने जलशुद्धीकरणासाठी यंदा तिप्पट दराने क्लोरीनची खरेदी केली आहे. गुजरातमध्ये झालेलं पाणीकपात, एका वर्षात पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली भरमसाठ वाढ आणि वाहतूक खर्चात झालेल्या २५ टक्के वाढीमुळे क्लोरिनचे दर प्रचंड वाढलं असून गुजरातमुळेच आता मुंबईकरांचं पाणी तुरट बनणार आहे.
तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, भातसा आणि तुळशी या तलावांमधून मुंबईला पाण्याचा पुरवठा केला जातो. या तलावांमधील अशुद्ध पाण्यावर भांडुप, येवई आणि पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये शुद्धीकरण केलं जातं. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रांसह विविध जलाशयांमधील पाणी निर्जंतुक बनवण्यासाठी वर्षाला ६३१३ मेट्रीक टन द्रवरुप क्लोरीनचा वापर करण्यात येतो.
या द्रवरुप क्लोरीनची खरेदी करण्यासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदांमध्ये यंदा प्रति मेट्रीक टन ९७०० दराने कंत्राटदारांनी बोली लावली आहे. परंतु, मागील वर्षी प्रति टन ३६४८ दराने या क्लोरीनची खरेदी करण्यात आली होती. त्यापूर्वी तीन वर्षे प्रति टन ६६१२ दराने खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिप्पट दराने क्लोरीनची खरेदी केली जात आहे.
महापालिका जलविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रवरुप क्लोरीनचं उत्पादन हे मुख्यत: गुजरात राज्यातून उपलब्ध होत असतं. या क्लोरीनच्या उत्पादनास शुद्ध पाण्याची आवश्यता असते. परंतु, सध्या गुजरात राज्यात १५ ते २० टक्के पाणीटंचाई आहे. या पाणीटंचाईमुळे द्रवरुप क्लोरीन उत्पादनात घट झाल्याचं म्हटलं जात आहे.
उत्पादनात झालेली घट आणि मागणीत झालेल्या वाढीमुळे या क्लोरीनचे दर हे जानेवारी २०१८पासून सतत वाढत आहेत. याशिवाय एका वर्षात डिझेलचे दरही प्रति लिटरमागे ९ ते १० रुपयांनी वाढल्याने वाहतूक खर्चात २५ टक्के वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या बाजारात द्रवरुप क्लोरीन प्रति टन १२५६७ रुपये असा दर आहे. त्यामुळे क्लोरीनच्या खरेदी करण्यात येणाऱ्या दरापेक्षा २५ टक्के दर कमी असल्याचा दावाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.