Advertisement

मुंबईकरांनो, मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर होईल १ हजार रुपयांचा दंड

मुंबई महापालिकेने सोमवारी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडल्यास १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

मुंबईकरांनो, मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर होईल १ हजार रुपयांचा दंड
SHARES

महाराष्ट्र सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देताच बहुतेक मुंबईकर आता कामाधंद्यासाठी बाहेर पडू लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताेंडाला मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याला अनेकांचं प्राधान्य असलं, तरी अजूनही काहीजण तोंडाला मास्क न लावताच घराबाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे. त्याला गांभीर्याने घेत मुंबई महापालिकेने सोमवारी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडल्यास १ हजार रुपयांचा दंड (wearing of mask is compulsory in public or workplaces of mumbai as per bmc ) ठोठावण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रशासनाकडून सातत्याने कोविड १९ संदर्भात खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात असतानाही काहीजण या आवाहनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. तोंडाला मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींमुळे त्यांच्या स्वत:सोबतच इतरांचंही आरोग्य धोक्यात येत असल्याने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या आदेशाने हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. या परित्रकानुसार सार्वजनिक ठिकाणी जाताना, प्रवास करताना किंवा घराबाहेर पडल्यावर तसंच खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणं बंधनकारक केलं आहे. मास्क न लावता घराबाहेर पडल्यास आणि लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्यास १ हजार रुपये दंड वसूल करण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन कायम, १ जुलैपासून ‘मिशन बिगीन अगेन’ २.० होणार सुरू

जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही भ्रमात न राहण्याची सूचना केली हाेती. आजही ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणं नाहीत. पण म्हणून त्यांना प्रादुर्भाव झाला नाही असं नाही, असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचं, मास्क वापरण्याचं, स्वच्छता पाळण्याचं, सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन केलं. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लिप्टो यासारखे आजार डोके वर काढतात हे लक्षात घेऊन नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छता बाळगून कुठेही पाणी साठू देऊ नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. 

कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. हे अजिबात अपेक्षित नाही. यामुळे कोरोनाची आटोक्यात ठेवलेली साथ मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभं राहील. हे रोखण्यासाठीच पोलिसांनी २ किमी अंतराचे निर्बंध टाकले आहेत. त्यामागे मुक्त आणि अनावश्यक वावराला रोखणं हाच उद्देश, असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - Mission Begin Again 2.0 : १ जुलैपासून काय सुरू, काय बंद?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा